
loksatta.com · Feb 14, 2026 · Collected from GDELT
Published: 20260214T204500Z
राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेचा शेवटचा दिवस होता. काही महत्त्वाच्या सदस्यांचं बोलून व्हायचं होतं. त्यांचं झालं की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन चर्चेला उत्तर देणार होत्या. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा होणार असल्यानं या पक्षाच्या प्रत्येक सदस्यासाठी वरिष्ठ सभागृहातील भाषण लक्षवेधी होणं गरजेचं होतं. राज्यसभेतील पक्षाचे गटनेते डेरेक ओब्रायन हे खणखणीत भाषण करतात. त्यांच्या भाषणामध्ये ठोस मुद्दे असतातच शिवाय, आकडेवारी, नेमके संदर्भ दिलेले असतात. या वेळी त्यांचं भाषण थोडं राजकीय होणं स्वाभाविकच होतं. कारण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये जबरदस्त द्वंद्व सुरू आहे. डेरेक केंद्र सरकारने पश्चिम बंगालचा निधी कसा थकवला आहे, हे सरकार राज्याचं नुकसान करत आहे. योजना राबवण्यामध्ये अडचण केली जात आहे वगैरे मुद्दे मांडत होते. त्यांच्या भाषणाची गाडी अचानक लोकसभेतील विरोधी नेत्यांकडं वळाली. डेरेक विरोधी पक्षनेत्यांचं कौतुक करत होते. त्यामध्ये प्रामुख्याने स्वपक्षाचे लोकसभेतील गटनेते अभिषेक बॅनर्जींनी मांडलेल्या मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला. त्यानंतर ते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडं वळाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपला काही मिळणार नाही, हीच स्थिती केरळ आणि तमिळनाडूमध्येही होईल. हे तर काहीच नाही, पुढच्या वर्षी बघा काय होतंय… २०२७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक आहे, तिथे भाजपची खरी परीक्षा आहे असं मानलं जातं. भाजपमध्ये सुरू असलेल्या नेतृत्वाच्या स्पर्धेमुळं हे राज्य भाजपसाठी आणखी महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत डेरेक २०२७ मध्ये अखिलेश यादव बाजी मारून जातील, असं सत्ताधारी पक्षाला डिवचत होते. त्यांचं भाषण आक्रमक होऊ लागलं होतं, तेवढ्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह उभे राहिले, त्यांना हरकतीचा मुद्दा उपस्थित करायचा होता पण, तेवढ्यात मागच्या बाकावर बसलेले साकेत गोखले आक्रमक झाले, त्यांनी गिरीराज यांना जोरजोरात बोलून विरोध करायला सुरुवात केली. गोखलेंचा आवाज इतका मोठा होता आणि ते गिरीराज यांना ज्या पद्धतीने विरोध करत होते, ते पाहून स्वत: गिरीराजदेखील आश्चर्यचकित झाले. गोखले हे काही उंचेपुरे, भारदस्त व्यक्तिमत्त्व नाही, त्यांची उंची, प्रकृती बेताची आहे. पण, त्यांचा उग्र अवतार अचंबित करणारा होता. दोन्ही सदस्यांमधील बाचाबाची एखाद-दोन मिनिटं झाली असेल. अखेर उपसभापतींनी दोघांनाही खाली बसवलं. डेरेक यांचं भाषण झाल्यावर गिरीराज उठून उभे राहिले, ते म्हणाले की, माझा आक्षेप इतकाच होता की, दुसर्या सभागृहातील सदस्यांची नावं इथं घेता येत नाहीत… गोखले आहेत मराठी, पण, ते खासदार आहेत पश्चिम बंगालमधील प्रादेशिक पक्षाचे. त्यामुळं ते मराठी भाषिक बंगाली खासदार आहेत. या पक्षाची अस्मिता बंगाली, त्यात हे मराठी फिट बसण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जींना आपल्या सदस्यांनी आक्रमकपणे अस्तित्व दाखवून द्यावं असं वाटत असेल तर त्यासाठी गोखले अजिबात मागं नाहीत. या पक्षाच्या डोला सेन वगैरे सदस्य तर त्यांच्या आक्रमकपणाबद्दल ओळखल्या जातात. आता एक ‘मराठी’ खासदारही त्यात सामील झालेला दिसतोय. दोघींचं हितगुज असं दृश्य सदनांमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतं. गेल्या आठवड्यामध्ये राज्यसभेत पहिल्या सत्रात शून्य प्रहरात सदस्य आपापले मुद्दे मांडत होते. सभागृहात उपस्थितीही फार नव्हती. असं असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आपल्या आसनावरून उठून काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधींच्या शेजारी जाऊन बसल्या. विरोधी पक्षांच्या बाकांवर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या बाजूच्या बाकावर सोनिया गांधी बसतात. जया बच्चन त्यांच्याजवळ जाऊन काही मिनिटं बोलत बसलेल्या होत्या. जया बच्चन बोलत होत्या, सोनिया गांधी मान हलवून त्यांना प्रतिसाद देत होत्या. त्या दोघी गंभीर मुद्द्यावर बोलत असाव्यात असं दिसलं. थोड्या वेळाने जया बच्चन यांचं बोलून झालं. या दोन्ही घराण्यांमध्ये कौटुंबिक संबंध राहिलेले नसले तरी, दोन्ही नेत्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या घटक आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी, प्रामुख्याने राहुल गांधींशी सलोख्याचे संबंध आहेत. दोघेही आपापलं राजकारण करतात हा भाग वेगळा. पण, दोन्ही पक्षांच्या सदस्या म्हणून सोनिया गांधी व जया बच्चन यांचं एकमेकांशी असलेलं कदाचित केवळ राजकीय स्वरूपाचं असू शकेल. तत्कालीन सभापती जगदीप धनखड यांच्याशी जया बच्चन यांच्याशी वाद झाला तेव्हा विरोधी पक्षांच्या महिला सदस्य जया बच्चन यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. त्यामध्ये सोनिया गांधीही होत्या. संसदेच्या आवारात जया बच्चन पत्रकारांशी बोलत असताना सोनिया गांधी मागं उभ्या राहिलेल्या दिसल्या. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका नेत्याने बोलावलेल्या स्नेहभोजनाला प्रियंका गांधी-वाड्रा व जया बच्चन गेल्या होत्या. दोघींनीही एकमेकांचं आत्मीयतेने स्वागत केलं होतं. गांधी व बच्चन कुटुंबातील संबंधांवर इतकं लिहिलं गेलं आहे की, त्यात आता काही नावीन्य राहिलेलं नाही. तरीही, अशा काही प्रसंगी दोन्ही कुटुंबांच्या वागण्याकडं लक्ष वेधून घेतलं जातं. आशीर्वाद असावेत संसदेच्या लॉबीमध्ये अकरा वाजेपर्यंत शुकशुकाट असतो. त्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता तुरळक लोक होते, त्यातही ‘सीआयएसएफ’चे जवान अधिक. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला येणार होत्या. वेळ अकरा वाजता ठरलेली होती. ज्यांना हे माहीत होतं असे एखाद-दोन पत्रकार तिथं आलेले होते. तेवढ्यात शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके घुटमळताना दिसले. ते बहुधा सुनेत्रा पवार कधी येणार याची फोनवरून चौकशी करत असावेत. तेवढ्यात लोकसभेच्या बाहेरील लॉबीत सुनेत्रा पवार आल्या. त्या अजून लॉबीत आलेल्याही नव्हत्या. लंके तिकडं धावले. त्यांनी सुनेत्रा पवारांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. लंकेंशिवाय अन्य कोणी शरद पवार गटाचा खासदार तिथं आलेला नव्हता. लंकेंनी तिथं येणं हे कदाचित सुनेत्रा पवारांबरोबर आलेल्या नेत्यांना पसंत पडलं नसावं. लंकेंना बघून त्यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांचा चेहरा इतका कोरडा होता की, जसं लंकेंना ते पहिल्यांदाच पाहात आहेत. अजित पवार गेल्याचं कळताच लंके शरद पवारांच्या घरी धावले होते. त्यांना भावना अनावर झाल्या होत्या हे अनेकांनी पाहिलं होतं. अजित पवारांवरच्या प्रेमापोटी लंके सुनेत्रा पवार यांच्या भेटीला आले असावेत. त्यामध्ये राजकारण असेलही, नसेलही. लोकसभेच्या लॉबीत लंकेंची उपस्थिती जाणवली. सुनेत्रा पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनाही भेटणार होत्या पण, त्यांची वेळ निश्चित नव्हती. कदाचित १२ वाजता भेटतील असं म्हटलं जात होतं. शहा संसदेच्या आपल्या दालनात आलेच १२ वाजून गेल्यानंतर. तोपर्यंत सुनेत्रा पवार अर्धा तासाहून अधिक काळ शहांच्या दालनाच्या प्रतीक्षा कक्षात बसून होत्या. त्यानंतर त्यांची शहांची भेट होऊ शकली. हे सगळं होत असताना रोहित पवार प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत असल्यानं तो दिवस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष दिल्लीत चव्हाट्यावर येण्याचा होता हे नक्की.